टाकळी हाजी ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक झाली,मतदान प्रक्रियेत ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदविला अशा सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिले पाहिजे.गावच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या राबविण्यासाठी गावाने एकत्र येवुन पुढाकार घ्यावा. विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती झाल्या पाहिजेत, त्यामुळे लोकांचा सहभाग वाढेल. घनकचरा व्यवस्थापन, बायो गॅस, निर्मल ग्राम , रोजगार हमी योजना अशा विविध योजना राबवून गाव सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन एक नवीन आदर्श गाव बनविण्यासाठी एकत्र या. जिल्हा परिषद , पंचायत समिती , कंपनीचे सी एस आर फंड यामधून शक्य तेवढी मदत केली जाईल. असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,फियाट कंपनीचे अध्यक्ष रवी गोगिया,वरिष्ठ उपाध्यक्ष राकेशजी बावेजा , शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजित देसाई, शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व टाकळी हाजी ग्रामपंचायत चे प्रशासक बी. आर. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे,पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे , माजी सरपंच दामूशेठ घोडे, माजी सरपंच बन्सीशेठ घोडे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.


