इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतकरी दुष्काळ निधी पासून वंचितच; यामध्ये चूक कोणाची ?
पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे दुष्काळ निधीपासून वंचित राहण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम 1971 मधील नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक पाहणीनोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा करणे बाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या मार्फत दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी वरील प्रमाणे जीआर काढला आहे की,प्रत्येक हंगामासाठी जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तींना शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये किंवा शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये मोबाईल या द्वारे पीक पाहणीने नोंदवलेल्या खातेदारांची पीक पाहणी संबंधित तलाठी यांनी शासनाने त्या हंगामासाठी ठरवून दिलेल्या कालावधीसाठी पूर्ण करणे आवश्यक राहील.
असा जीआर मध्ये उल्लेख असताना सुद्धा इंदापूरचे तहसीलदार हे जाणून-बुजून इंदापूर मधील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहेत कारण प्रत्येक शेतकरी हा मोबाईल याद्वारे पीक नोंदणी करू शकत नाही कारण तो एकतर अडाणी आहे किंवा त्याला मोबाईल चालवता येत नाही.
त्यासाठी महाराष्ट्र शासनाने सदरील जीआर मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की पीक पाणी राहिलेल्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी ही तलाठी यांनी करणे आहे.
26 जून 2024 पासून इंदापूर तालुक्यामधील निरगुडे गावांमध्ये भगवान खारतोडे व पूनम खारतोडे यांनी चक्री उपोषण सुरू केले असून ते अद्याप पर्यंत चालू आहे त्याचे लोन हे इतर गावांमध्ये सुद्धा साखळी उपोषणाच्या रूपात पसरलेले आहे.
या चक्री उपोषण व साखळी उपोषणाची साधी दखल सुद्धा इंदापूरच्या प्रशासनाने घेतली नाही हे सर्वात मोठी शोकांतिका आहे, तसेच इतर शेजारी असणाऱ्या तालुक्यांमध्ये दुष्काळ निधी हा सरसकट शेतकऱ्यांना भेटलेला आहे परंतू इंदापूर मधील माझ्या वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना हा दुष्काळ निधी का मिळत नाही इंदापूरचे तहसील जाणून बुजून शेतकऱ्यांना दुष्काळ निधी पासून वंचीत ठेवण्याचे काम करत आहेत असा स्पष्ट आरोप उपोषणकर्ते भगवान खारतोडे यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे.
