March 30, 2026
हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 
        येरवडा-विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या शहरातील उपनगर भागातील येरवडा परिसरातील गेनबा सोपान मोझे विद्यालयात बाहेरच्या तरुणांनी धारदार शस्त्रांसह राडा घातल्याने या भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून  तरुणांनी धारदार शस्त्रांसह परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.         

प्रत्यक्षदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार येरवडा परिसरात नागपूर चाळ येथे खाजगी शिक्षण संस्थेचे गेनबा सोपानराव मोझे विद्यालयासह महाविद्यालय असून या ठिकाणी सकाळ ते दुपार अशा दोन स्वरूपात विद्यालयाच्या शाळा भरत असतात. सोमवारी दुपारी १२. ३०च्या  सुमारास दुपाराशीफची शाळा भरली असताना विद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ काही उनाड तरुण थांबलेले असतांना दुसऱ्या गटातील एका मुलाचा चुकून यातील एका मुलाला दगड लागल्यामुळे यातील जमलेल्या तरुणांनी संबंधित तरुणास मारहाण करण्यासाठी पाठलाग केला असताना संबंधित तरुण भयभीत झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून मोझे विद्यालयाच्या आवारात पळ काढून महिला शिक्षकांच्या कार्यालयात जाऊन घुसला,           

यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे देखील कॉलेज सुटल्याने विद्यार्थ्यांचा जमाव ही परिसरात मोठ्या प्रमाणात होता. पण कोणालाही या घटनेची काहीच कल्पना नसल्यामुळे काही कळण्याच्या आतमध्ये दगड लागलेल्या तरुणांनी देखील विद्यालयाच्या आवारात प्रवेश केला. एवढी गर्दी का?जमली म्हणून शिक्षकांनी देखील कार्यालयाकडे धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. यादरम्यान जमलेल्या शिक्षकांनी तिन्ही तरुणांना समजविण्याचा प्रयत्न केला असता तिघे देखील ऐकण्याच्या तयारीत नसल्यामुळे शिक्षकांना देखील काय करावे आणि काही नाही हे समजत नव्हते. यावेळी संबंधित घटना विद्यालयातील  विद्यार्थ्यांच्या समोर घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते.     
       यादरम्यान शिक्षकांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला असता जमलेल्या जमावाने संबंधित तरुणास शिक्षकांच्या कार्यालयात जाऊन तरुणास मारहाण केली. पण याच दरम्यान पिडीत तरुणाने त्याच्या भावास व मित्रांना फोन करून घटनेची माहिती फोनवरून कळविली असल्यामुळे सहा ते सात जणांचा जमाव विद्यालयाच्या आवारात आल्यावर या तरुणांनी जमावातील एका दोघांस हाताने मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने लपविले कोयते बाहेर काढल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण पसरून या घटनेत एखाद्या तरुणाचा खून होतो की,काय?अशी परिस्थिती परिसरामध्ये निर्माण झाली होती. यावेळी शाळेच्या आवारात शिक्षकांसह नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.संबंधित जमावाने त्यामधील एका तरुणाच्या हातावर वार केला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या तरुणांनी देखील विद्यालयाच्या कार्यालयात पळाल्यामुळे होणाऱ्या दुर्घटनेत ते त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून बालंबाल बचावले.यावेळी संतप्त जमावाच्या हातामध्ये धारदार शस्त्रे पाहून भयभीत झालेल्या शिक्षकांनी देखील पुढे जाण्याचे धाडस केले नाही. यावेळी शाळेतील काही शिक्षकांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यावर धारदार शस्त्रे हातात घेऊन मिरविणाऱ्या व दहशत पसरविणाऱ्या तरुणांनी घटनास्थळापासून पलायन केले. घटना घडल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून घेतली. अशा घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर येरवडा पोलीस स्टेशन असतांना देखील पोलिसांना घटनेची माहिती तात्काळ का?समजली नाही. याबाबत पालकांसह नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या घटना शाळेच्या आवारात घडत असतील तर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेच्या आवारात सर्रासपणे एक तरी पोलीस कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी विद्यालयाकडून वारंवार पाठपुरावा करून देखील पोलिसांकडून आजपर्यंत कोणत्याच प्रकारे उपाययोजना करण्यात आली नसून शाळेच्या पाठपुराव्याला पोलिसांकडून केराची टोपली दाखविण्यात येत असून एखाद्या दिवशी गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडल्यानंतरच झोपी गेलेल्या पोलीस यंत्रणेला जाग येणार का?असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.यासंदर्भात येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही,.