March 30, 2026
सुनिल भंडारे पाटील
      संगळीकडे विहीरी तळ गाठत असताना तलाव नाले कोरडे पडल्याने पशुपक्षी गायीगुरांना पाणी पाजण्यासाठी जवळपास कोसभरावर कुठे मोकळे पाणी उरले नाही . त्यामुळे गुराख्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकाव्या लागत असताना मिडगुलवाडी(ता शिरूर) या दुष्काळी गाव शिवेवरील खाजगी हद्दीतील तळ्यात एप्रील ऊजाडला तरी पाणी शिल्लक असल्याने पशु पक्षी गाया म्हशी दुरवरून पाणी पिण्यास येतात व गाया म्हशींना मोकळे पाणी पिण्यास व डुंबण्यास मिळाल्याने समाधान व्यक्त करतात. 

 फोटोतील गोपालक हा मुळ गुजरातचा असून सविंदणे कान्हूर मेसाई शिवेवरील फटांगडे यांचे रान चरण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून घेत आहे . उन्हाळ्यामुळे खाली लंघे वस्तीपर्यत कुठेही पाणी शिल्लक न राहील्याने सदर रूपाभार मिर कोसभराहून मिडगुलवाडी हद्दीतील खाजगी तळ्यात ५० गिर गाया व ३० म्हशी पाणी पाजण्यास येतो . या तळ्याला पाणी उरण्याने कारण म्हणजे गेल्या १५ वर्षात मिडगुले यांनी प्रतिवर्षी उन्हाळ्यात ५० फुटी पोकलेन द्वारा लाखो खर्च करून दोन परसावर खोलीकरण केले आहे . त्यामुळे मोठया प्रमाणात पाणी संचय झाल्याने तलावा खालील विहीरींनाही अद्याप पाणी असून सर्वानांच फायदा होत आहे . आणि पशु पक्षी गायी गुरांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असल्याचे समाधान कृषी पदवीधर शेतकरी अमित मिडगुले यांनी व्यक्त केले . म्हणतात पाण्यासारखं पुण्य नाही , आपण कुणी वाटसरु आला तरी तांबभर पाणी विचारतो . मग या मुक्या जनावरांना पाणी उपलब्ध केल्याने नक्कीच पुण्यांचं काम केल्याचे गोपालक रुपाभार यांनी बोलून दाखविले . इतरत्र वनविभागाद्वारे कुठे कुठे टँकरने पाणी ओतल्याचे म्हसेकर साहेबांचे कौतुक केले जातेय मग इथे स्वखर्चाने जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देणाऱ्या कर्जबाजारी शेतकऱ्याची दखल घेऊन दाद द्यावीच लागेल .