March 30, 2026
काय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदम ओकेचं!
रस्त्यालगत बसणाऱ्या भाजीविक्रत्यांमुळे होतेयं वाहतूक कोंडी.
सुविधांचा अभाव,पावती विना वसूली मात्र होतेयं जोमात.
सुनील भंडारे पाटील 
गेले काही दिवसांपासून वाघोली परिसरात संततधार पाऊसाने जोर धरला असल्याने परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साठून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे.
वाघोलीचे बाजार मैदान व भाजी मंडई परिसरही याला अपवाद राहिला नाही. भाजीमंडई परिसरात यामुळे चिखल,गाळ व कुजलेल्या भाज्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.     

अश्या अवस्थेमुळे “काय तो वाघोलीचा बाजार,काय तो बाजारातील चिखल,काय ते कचरा व घाणीचे साम्राज्य,एकदम ओकेचं!” अशी नागरिकांवर उपहासात्मक बोलण्याची वेळ आली आहे.

       या सर्वात मात्र शेतकरी,खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत असल्याचे पहायला मिळत आहे.या
मंडई परिसरात कायमचं सामान्य सुविधांची वणावा असल्याने ऐन पाऊसाळ्यात शेतकरी,भाजीविक्रेते,नागरिकांना उघड्यावरचं लघुशंकेसाठी जावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.दर मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पुणे-नगर महामार्गासह आव्हाळवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रेते आपला माल विकायला बसत असल्याने वाहतुक समस्येचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.दुर्दैवाने तांत्रिक बिघडामुळे एखाद्या वाहनाचा ब्रेक लागला नाही अथवा मोठ्या गर्दीत नजरचुकीने वाहनांचा थोडा जरी धक्का लागला तर मोठा अपघातही होऊ शकतो.

साधारण १ वर्षापूर्वी जवळपास २२ गावांसह वाघोली हे गाव पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट होऊनही वाघोलीच्या भाजीमंडई परिसरात साधे स्वच्छता गृहाचे बांधकाम महानगरपालिकेचा संबंधित विभाग करु शकला नाही?हि खेदाची बाब आहे.ग्रामपंचायत काळापासून पावती विना होत असणारी वसूली मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने जोमात सुरु असल्याची कुणकुण मात्र ऐकायला मिळत आहे.

       तातडीने संबंधित विभागाने लक्ष्य घालून मंडई परिसरात ठिकठिकाणी मुरुम टाकून व आजुबाजुला साचलेला कचरा उचलून स्वच्छता करावी. त्याचबरोबर किमान स्वच्छता गृह,पाणी अश्या भौतिक सुविधा तरी राबवाव्यात अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.