March 30, 2026
वाघोलीतील समस्या सोडवून विकास कामे मार्गी लावावी:शिवदास उबाळे  पुणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन सुपूर्त

सुनील भंडारे पाटील 

वाघोली गाव महापालिकेत समाविष्ट होऊन ४८ महिने झाले असून ग्रामपंचायत करा पेक्षा ४ पट पालिका घेत आहे.इतका कर भरत असल्याने वाघोलीचा विकासही तेव्हढ्या प्रमाणात झाला पाहिजेत.

परंतु वाघोली महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून वाघोलीचा विकास खुंटला असून अनेक समस्यांना वाघोलीकरांना सामोरे जावे लागत आहे.

याची दखल घेऊन वाघोलीचे माजी सरपंच तथा भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या तत्कालीन सरपंच तथा हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे यांनी वाघोलीतील समस्या सोडवून विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागावीत याबाबतचे निवेदन पुणे महानगर पालिकेचे आयुक्त यांना नुकतेच सुपूर्त केले.

निवेदनात समस्या व विकास कामांबाबत म्हटले आहे की,वाघोली गावठान व इतर भाग सोडला तर वाघोली गावामध्ये ड्रेनेज लाईन आज पर्यंत झालेली नाही.सध्या अस्तित्वात असणा-या ड्रेनेज लाईन कमी व्यासाची असल्याने त्यामधुन वाढत्या लोकवस्तीमधील ड्रेनेज जाणे शक्य नाही.

तसेच गावामधील ड्रेनेज लाईनमध्ये नविन तयार होणा-या सोसायटी,नगर,गृहप्रकल्प यांचे ड्रेनेज जोडले गेले नाही.मुख्य ड्रेनेज लाईनचे काम न झाल्याने या समस्या होत आहेत.प्रामुख्याने फुलमळारस्ता,कटकेवाडी,गाडेवस्ती, बकोरी रस्ता,आयव्हीइस्टेट,केसनंद रस्ता, दुबेनगर या भागामध्ये ड्रेनेज व्यवस्था नाही.

त्यामुळे याबाबत विकास आराखडा तयार करुन सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पासह,अवश्यकते नुसार मुख्य लाईन व अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणेची कामे करणेत यावीत.

वाघोली गावामधुन जाणारा पुणे-नगर महामार्गावर कायम २ ते ३ किमी लांबीच्या वाहनांचा रांगा लागलेल्या असतात.या रस्त्यासाठी कोणताही पर्याय रस्ता होत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

ही समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी वाघोली गावामधुन सन १९९९ च्या डिपी मध्ये जे डिपीरोड आरक्षित करणेत आलेले आहेत ते रस्ते केल्यास वाघोली गावामधील वाहतुक कोंडिचा प्रश्न १०० % मार्गी लागला जाणार आहे.ज्या ठिकाणी गृहप्रकल्प झाले आहेत त्या ठिकाणी सदर रस्त्याची क्षेत्र मोकळे सोडण्यात आले आहे.

काही भागामध्ये शेती असुन त्या भागामधील शेतकरी यांना पुर्ण विश्वासात घेवुन हे रस्ते करणे शक्य होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने आपलेघर सोसायटी ते उबाळेनगर-चोखीधानी रस्ता-रायसोनी कॉलेज-केसनंदरस्ता-आयव्हि इस्टेट,बकोरीफाटा पर्यंत ३० मिटर रुंदीचा रस्ता झाल्यास

पुणे नगर रस्त्यावरील वाहतुक या मार्गे पुण्यामध्ये येऊ शकते,बकोरी फाटा ते भावडीरोड-लोहगाव रोड-कावडेवस्ती-खांदवेनगर नगर रस्ता पर्यंत या मार्गे पुण्यामधील वाहतुकी बाहेर काढणे शक्य होणार आहे.

वाघोली गावाची लोकसंख्या २ ते ३ लाख असुन वाघोली गावासाठी प्रति दिवसाला ४० ते ५० द.ल.लि. पाण्याची अवश्यकता आहे.परंतु सध्या चालु असणाच्या नळ पाणीपुरठा योजनेमधुन फक्त २ ते ३ द.ल.लि.पाणी मिळत आहे.

यामध्ये गावठान व इतर काहि भागामध्ये पाणीपुरवठा होत आहे. उर्वरीत सर्व गृहप्रकल्प,नगर या ठिकाणी पाणी पुरवठा केला जात नाही.इतर सर्व भागामध्ये बोअरवेल,टैंकर द्वारे पाणीपुरवठा होत आहे.

वाघोली मधील नागरीकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्राधिकारणामार्फत पाणीपुरवठा योजनेचे काम चालु आहे.या कामाचे कार्यारंभ आदेश २०१९ ला देण्यात आले आहेत.परंतु हि योजना अजूनही चालु झालेली नाही.

पुणे महानगर पालिकेमार्फत वाघोली व लोहगाव साठी नविन पाणीपुरवठा योजना मंजुर करणेत आलेली आहे.या योजनेचे काम त्वरीत पुर्ण करणेत यावे.

आदी वाघोलीतील विकासकामे मार्गी लावत उद्भवणाऱ्या सर्व समस्या पुणे महानगर पालिकेने सोडविण्यासाठी पावले उचलावीत असे उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात आयुक्तांकडे मागणी केली आहे.

 

भैरवनाथ,वाघेश्वर व कुंभारतळे यासाठी स्वंतत्र विकास आराखडा करावा

वाघोली गावामध्ये पुरातन काळापासुन भैरवनाथ तलाव,वाघेश्वर तलाव व कुंभार तळे आहे. या तळ्यामध्ये पुर्वी मुबलक पाणीसाठी उपलब्ध होत होता.

परंतु वाघोली गावामध्ये झालेल्या विकासनामुळे या तळ्या मध्ये येणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहेत.या तळ्यांची देखभाल व्यवस्था केल्यास या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणीसाठी वर्षभर उपलब्ध होऊ शकतो.

भैरवानाथ तळे हे ३५ ते ४० एकर परिसरामध्ये पसरले असुन या ठिकाणी प्राधिकरण व ग्रामपंचायतीमाफत गाळा काढणेचे काम करणेत आले होते.त्यामुळे तळाची खोली वाढली असुन या ठिकाणी पाणीसाठाही वाढता आहे.

त्यामुळे परिसारामधील सर्व बोअरवेल व विहिरींचा पाण्याचे पातळीमध्ये लक्षणिय वाढ झाल्याचे दिसुन आहे.मनपा मार्फत वाघोली गावामधील भैरवनाथ तळे,वाघेश्वर तळे व कुंभार तळे याठिकाणी स्वंतत्र विकास आराखडा तयार करुन ,

तळ्यांची दुरुस्ती तसेच या ठिकाणी उद्यान निर्मिती,जॉगिंग ट्रॅक,खेळाची मैदाने तयार होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक तळ्याचे संगोपन होऊन नागरीकांसाठी पर्यटनाची ठिकाणे तयार होतील.