लोणीकंद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’च्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
सुनील भंडारे पाटील
महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरा’च्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणीकंद येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीत शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभागामार्फत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवांचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे. यात प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगीसंदर्भात मार्गदर्शन, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजना यांचा समावेश आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक प्रकरणांसाठी आवश्यक ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, पंचायत समिती सदस्य मोनीका कंद, राणी वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, सरपंच सुप्रिया कंद, उपसरपंच डॉ. सोनाली जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, मंडल अधिकारी संदीप झिंगाटे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अशा उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मोठा दिलासा मिळत असून, विविध सेवा एकाच ठिकाणी व तात्काळ उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या या उपक्रमामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होणार आहे.
![]()
